Monday, April 20, 2026

उद्यापासून पुढील 3 दिवस धोक्याचे! विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार अन् धो-धो पाऊस कोसळणार

Date:

मुंबई प्रतिनिधी : राज्यात उष्णतेची लाट असतानाच आता हवामानात मोठा फेरबदल पहायला मिळत आहे. कारण, सोमवारपासून पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पाऊस थैमान घालणार आहे. 20 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि 40-50 किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.

28 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट : हवामान विभागाने सोमवारी (20 एप्रिल) राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपीट : या पैकी काही जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही भागात गारपीट होण्याचा अंदाज आहे.

पुढील हवामानाचा अंदाज : पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.

पावसाचे क्षेत्र वाढण्याचे संकेत : सध्याच्या हवामान अंदाजानुसार 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाचे क्षेत्र वाढण्याचे संकेत आहेत. ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह (पुणे विभाग) मराठवाडा (प्रामुख्याने दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भात (प्रामुख्याने अमरावती विभाग) देखील काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल. तर, 22 तारखेला वादळी पावसाचे क्षेत्र आणि त्याच्या तीव्रतेत घट होईल.

राज्यातील कमाल आणि किमान तापमान

कमाल तापमान – महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढील 3 दिवसांत कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू घट होईल आणि त्यानंतर त्यात मोठा बदल होणार नाही. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील 2 दिवसांत कमाल तापमानात 40-42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर त्यात हलूहळू घट होईल.

किमान तापमान – पुढील 7 दिवसांत महाराष्ट्र प्रदेशात किमान तापमानात मोठा बदल होणार नाही.

मुंबईतील हवामानाचा अंदाज : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश मुख्यत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

शेअर करा

आणखी वाचा