रत्नागिरी प्रतिनिधी : दरवर्षीप्रमाणे सरत्या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा ३१ मार्च रोजी जाहीर करण्याची प्रथा स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने जपली. हा सर्व अहवाल मान्यवरांना पाठवला जातो. या अहवालावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेश देऊन सुखद आश्चर्याचा धक्का दिला आहे, अशी प्रतिक्रिया पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छा संदेश ही आनंदाची गोष्ट : त्यांनी सांगितले की, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील कामगिरीचा वार्षिक अहवाल प्रकाशित झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छा या पतसंस्थेच्या उत्तुंग कामगिरीची घेतलेली दखल आहे. मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छा संदेश येणे ही आनंदाची गोष्ट आहे.
संस्थेची सातत्यपूर्ण प्रगती समाधानकारक : मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे की, संस्थेची सातत्यपूर्ण प्रगती समाधानकारक असून सहकार क्षेत्रात केलेले कार्य प्रेरणादायी आहे. कोकणातील, विशेषतः रत्नागिरीसारख्या भागात सहकार चळवळीच्या माध्यमातून जनसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
पतसंस्थेच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळेल : सहकार चळवळीला बळकटी देत नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी संस्थेने उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुढील काळातही संस्था अधिक प्रभावीपणे कार्य करत सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा संदेशामुळे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळेल, असे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
