रत्नागिरी प्रतिनिधी : शहरातील कीर्तीनगर सारख्या वर्दळीच्या परिसरात दिवसाढवळ्या चोरीची एक मोठी घटना घडली आहे. दूध वितरण करणाऱ्या एका व्यावसायिकाच्या गाडीतून अज्ञात चोरट्याने तब्बल ७० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली. या घटनेमुळे शहरात व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय? : मांडवी मायनंकवाडी येथील रहिवासी आणि ‘गोकुळ दूध’चे वितरक साईप्रसाद सदानंद मुस्कर (२८) हे २० मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे दूध वितरणासाठी बाहेर पडले होते. सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान त्यांनी आपली टाटा सुपर एस गाडी (MH-08/W/1152) कीर्तीनगरमधील ‘साई सागर’ दुकानासमोर उभी केली. मुस्कर हे दुकानात दूध देण्यासाठी गेले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हर सीटजवळ ठेवलेली ७० हजार रुपयांची काळी हॅण्डबॅग अत्यंत शिताफीने पळवून नेली.
पोलिसांकडून तपास सुरू
मुस्कर यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा नोंदवला आहे. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्याचा माग काढला जात आहे.
