रत्नागिरी प्रतिनिधी – रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पत्रकार भवनाची मागणी आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून लवकरच डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथे पत्रकार भवनाच्या इमारतीचे आज सायंकाळी भूमिपूजन होणार आहे.
पत्रकारांना स्वतंत्र, सुसज्ज आणि हक्काची वास्तू मिळावी यासाठी जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांकडून अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर शासनस्तरावर या मागणीची दखल घेतली गेल्याने पत्रकारांमध्ये समाधान आणि उत्सुकतेचे वातावरण आहे.
प्रस्तावित पत्रकार भवनामुळे जिल्ह्यातील पत्रकारांना बैठका, पत्रकार परिषद, प्रशिक्षण कार्यशाळा तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. आधुनिक सुविधा, प्रशस्त सभागृह आणि डिजिटल माध्यमांसाठी आवश्यक व्यवस्था यामुळे हे भवन पत्रकारांसाठी मार्गदर्शक केंद्र ठरणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असून पत्रकार बांधवांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. समाजातील सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या पत्रकारांना हक्काची वास्तू मिळण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक मानले जात आहे.
