Friday, September 4, 2026

मुंबईकर आणि पर्यटकांसाठी खुशखबर ; मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता सातही दिवस सुरू होण्याचा मार्ग मोकळा

Date:

मुंबई प्रतिनिधी – सिंधुदुर्गवासीय आणि पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळावरून होणारी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या विमानसेवेसाठी १०० टक्के व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकर आणि सिंधुदुर्ग वासियांना दररोज या विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली आहे. 

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. देश-विदेशातील पर्यटक येथील पर्यटन अनुभवण्यासाठी येत असतात. मात्र सिंधुदुर्ग – मुंबई विमान सेवा बंद असल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटनावर होत होता. आता शासनाच्या निर्णयामुळे सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार असून स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि खाजगी चालकांना याचा मोठा फायदा होईल. मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यान दररोज विमान उपलब्ध झाल्यामुळे व्यापारी उलाढाल वाढण्यास मदत होईल. सण-उत्सव काळात चाकरमान्यांना आता प्रवासाचा खात्रीशीर पर्याय उपलब्ध असेल.

तसेच तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायी ठरणार आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चिपी विमानतळावरील विमानसेवेच्या विस्कळीतपणामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत होती. ही सेवा नियमित व्हावी यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांनी सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर मंत्रिमंडळाने यावर शिक्कामोर्तब केल्याने पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.

शेअर करा

आणखी वाचा