रत्नागिरी प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातील विविध भागात ढगाळ वातावरण असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे आज दुपारी कणकवली शहर परिसरातील काही भागांमध्ये गारांसह पाऊस पडला दुपारी सव्वा तीन ते पावणेचार वाजताच्या दरम्याने हा गारांचा पाऊस झाला. वाढलेल्या तापमानामुळे अंगाची काहीली होत असताना पाऊस पडल्याने काहीसा गारवा निर्माण झाला. मात्र आता काही तासानंतर पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आज दुपारी ढगाळ वातावरण दिसून येत होते. काही ठिकाणी पावसाचे थेंबही पडत होते. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला. काही ठिकाणी पावसाचे शिंतोडे पडल्याची माहिती मिळत आहे. आधीच हापूसचे पीक कमी असताना पावसाची कणकवली परिसरातील हजेरी ही गारपिटीसह झाल्याने हापूसला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
